Site is Sponsered by
 
Shewalkar Developers Ltd.

पदाधिकारी

मनोहर म्हैसाळकर
अध्यक्ष

वामन तेलंग
कार्यवाह

नरेश सबजीवाले

कोषाध्यक्ष

* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही मराठीच्या वाङमय व्यवहार क्षेत्रातील सर्वात जुनी संस्था, कालांतराने, त्याकाळी मराठी मुलुखाबाहेर, विदर्भ साहित्य संघ, मुंबई मराठी साहित्य संघ व मराठवाडा साहित्य परिषद या संस्था उदयाला आल्या. मधल्या काळामध्ये सर्व मराठी भाषिक मुलुख एका राज्य छ्त्राखाली आणण्याचा विचार राजकीय क्षेत्रामध्ये गतिमान झाला होता. त्या विचाराला बळ देण्यासाठी आणि मराठी भाषा व साहित्य ह्या संदर्भातील समान प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या मराठी साहित्य संस्थांना एकत्र आणण्याचे आणि सर्वांची मिळून एक प्रातिनिधिक संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्या प्रयत्नांची परिणती १९५१ मध्ये सर्व साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींची मिरज येथे बैठक होण्यात झाली. कविवर्य अनिल उपाख्य आत्माराम रावजी देशपांडे यांचा त्यात पुढाकार होता. मिरजेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानीही अनिलच होते. या बैठकीत सर्व संस्थांमिळून तयार होणाऱ्या संघ-संस्थेच्या घटनेचा मसुदा तयार करण्यात आला. संकल्पित संस्थेला 'मराठी साहित्य महामंडळ' असे नाव द्यावे अशी अनिलांनीच सूचना केली आणि 'मराठी साहित्य महामंडळ' अस्तित्वात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, विदर्भ साहित्य संघ नागपूर, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद व मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई ह्या आपआपल्या प्रदेशात स्वायत्त असणाऱ्या घटक संस्थांमिळून स्थापन झालेल्या 'मराठी साहित्य महामंडळात' मध्य प्रदेश, आंध्र, कर्नाटक, गोवा व छ्त्तीसगड ह्या राज्यांमधील प्रातिनिधिक मराठी साहित्य संस्था पुढे टप्प्याटप्प्याने समाविष्ट होऊन 'अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ' साकार झाले.

 

* स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्याच्या साहित्य परिषदेच्या वतीने 'महाराष्ट्र साहित्य संमेलने' भरविली जात. हे कार्य १ जून १९६४ पासून महामंडळाने आपल्या हाती घेतले.

 

* आजच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची मूळ संकल्पना नागपूर 'तरुण भारत' चे सव्यसाची संपादक व सुप्रसिध्द साहित्यिक कै. श्री. ग. त्र्यं. माडखोलकर यांची. १९४६ मध्ये बेळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये ललित साहित्य सभेचे अध्यक्ष या नात्याने १२ मे १९४६ रोजी केलेल्या अध्यक्षीय भाषणामधून माडखोलकरांनी वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या समस्त मराठी भाषकांच्या एकीकरणाचा विषय मांडला होता. इतकेच नव्हे तर, बेळगावच्या साहित्य संमेलनात त्या विषयाच्या अनुषंगाने तीन ठराव आणून व ते मंजूर करवून घेऊन आणि पुढे सातत्याने त्या विषयाचा पाठपुरावा करून माडखोलकरांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची पायाभरणी केली.

 

* महामंडळाच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याची योजना १९६५ पासून कार्यान्वित आहे. तत्पूर्वीची संमेलने जमेस धरून नागपूराला दि. २,३ व ४ फ़ेब्रुवारी २००७ या तारखांना होत असलेले महामंडळाचे संमेलन ८० वे साहित्य संमेलन आहे. स्थान निश्चितीपासून तो संमेलनांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन महामंडळच करते. तसे करतांना प्रत्येक पातळीवर संमेलनाचे निमंत्रण देणाऱ्या संस्थेशी विचार-विनिमय केला जातो.

 

* महामंडळाचे कार्यालय पुणे, नागपूर, औरंगाबाद व मुंबई ह्या ठिकाणी क्रमाक्रमाने ३-३ वर्षांसाठी राहते. पदाधिकाऱ्यांची निवड महामंडळाच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते केली जाते. आजमितीस महामंडळाचे कार्यालय विदर्भ साहित्य संघाकडे आहे. अध्यक्ष श्री. मनोहर म्हैसाळकर, उपाध्यक्ष श्री. शरद कनमडीकर (भोपाळ), कोषाध्यक्ष श्री. नरेश सबजीवाले व कार्यवाह श्री. वामन तेलंग हे महामंडळाचे पदाधिकारी आहेत. सभासदांमध्ये सर्वश्री कौतिकराव ठाले-पाटील, चंद्रकांत पाटील व कुंडलिक अतकरे (सर्व औरंगाबाद), गं.ना. जोगळेकर, वि. भा. देशपांडे व. ह.ल. निपुणगे (सर्व पुणे), उषा तांबे, सुहासिनी कीर्तीकर व कुंदा पडळकर (सर्व मुंबई), विद्या देवधर (हैद्राबाद), जे.एन. कदम (होळसमुद्र-कर्नाटक), कपूर वासनिक (बिलासपूर), सुरेश नाईक (गोवा), आणि वनिता ठाकूर (बडोदे) यांचा समावेश आहे.

 

* अलीकडच्या काळात महामंडळाच्या वतीने एक संमेलन- निधी (महाकोष) स्थापन करण्यात आला आहे. आजवर या निधीमध्ये अडतीस लाख रुपये जमा झाले आहेत. या निधीसाठी वेगळे विश्वस्त मंडळ आहे. वसुंधरा पेंडसे नाईक संमेलन- निधी महाकोषाच्या कार्यकारी विश्वस्त आहेत.

 

* महाराष्ट्र राज्य शासनातर्फ़े महामंडळाला वार्षिक १ लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त होते.

 

* महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यासाठी आयोजक संस्थेला राज्य शासनाच्या वतीने २५ लक्ष रुपयांचे अनुदान मिळते.

 

संमेलनाखेरीज महाराष्ट्राबाहेर होणाऱ्या महामंडळाच्या चर्चासत्रादी उपक्रमांसाठी महामंडळ समाविष्ट संस्थांना आर्थिक साह्य करते.

 

* दरवर्षी महामंडळ आपला स्थापना दिवस साजरा करीत असते. महनीय वक्त्यांचे भाषण आणि दिवसभराचे चर्चासत्र असे त्याचे स्वरूप असते.

 

 

 

 

Copyright 2006-2007. Vidarbha Sahitya Sangha .All rights reserved.